कोण म्हणतं भारत गरिबांचा देश, श्रीमंतांच्या यादीत चौथा नंबर; अहवालातून मोठा खुलासा

Indian Billionaire : देशात गडगंज संपत्ती असणाऱ्या लोकांची संख्या किती आहे यावरुन जगात (Indian Billionaire) त्या देशाचं स्टेटस ठरतं. भारताचा विचार केला तर आता भारतात श्रीमंतांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. आता अशी स्थिती आहे की भारत जगातील चौथा असा देश बनला आहे जिथे सर्वाधिक श्रीमंत लोक राहतात. नाईट फ्रँक ग्लोबल वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार भारतातील 85 हजार 698 लोकांकडे 10 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे.
याबाबतीत अमेरिका, चीन आणि जपान हे तीनच देश भारताच्या पुढे आहेत. देशाची मजबूत अर्थव्यवस्था, भांडवल आणि वाढता व्यापार या कारणांमुळे भारतात श्रीमंतांची संख्या वेगाने वाढत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
रिपोर्टवर विश्वास ठेवला तर आधीच्या काळात संपत्ती जमा करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागत होता. पण आता देशात दळणवळणाची साधनं प्रचंड वाढली आहे. डिजीटल क्रांती झाली आहे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर विशेष करुन स्मार्टफोन्स आणि डिजिटल बँकिंगचा मोठा विस्तार झाल्याने श्रीमंत होण्यातील अडचणी कमी झाल्या आहेत. भारतात अब्जाधीशांच्या संख्येत जबरदस्त वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या 12 टक्क्यांनी वाढली आहे. 2023 मध्ये भारतात 165 अब्जाधीश होते आता यात वाढ होऊन ही संख्या 191 झाली आहे.
‘झणझणीत मिसळ’, ‘छोले भटुरे’ अन् ‘स्वादिष्ट पराठा’, बेस्ट ब्रेकफास्ट यादीत 3 भारतीय डिश
2028 मध्ये होणार 1 लाख अब्जाधीश
एका वर्षात 26 अब्जाधीश वाढले आहेत. 2019 मध्ये या यादीत फक्त सात लोकांचा समावेश होता. भारतातील अब्जाधीशांकडे एकूण 0.95 ट्रिलियन डॉलर्स संपत्ती आहे. याबाबतीत जर्मनी, फ्रान्स ब्रिटेन भारताच्या मागे आहेत. आता सन 2028 पर्यंत भारतात अब्जाधीशांची संख्या 43 टक्क्यांनी वाढू शकते. अब्जाधीशांची संख्या 1,22,119 होऊ शकते. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत ही संभावित वाढ सर्वाधिक आहे.
विशेष म्हणजे भारतातील श्रीमंत व्यक्ती अन्य देशांतील श्रीमंतांप्रमाणेच रियल इस्टेट व्यापाराला जास्त प्राधान्य देत आहेत. जागतिक पातळीवर अब्जाधीशांतील 30 टक्के अब्जाधीश रियल इस्टेट व्यापाराशी संबंधित आहेत. भारतात या क्षेत्रात प्रचंड वाढ होत आहे. या क्षेत्रातील उद्योजकांची संख्याही वेगाने वाढत चालली आहे. देशाच्या विकासात या क्षेत्राचे योगदान मोठे आहे.
भारत चौथी मोठी अर्थव्यवस्था
भारतासाठी सध्या अनुकूल वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे. आता आपण जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत. देशाची अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची झाली आहे. भारताची अर्थव्यवस्था जपानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी झाली आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच भारताच्या पुढे आहेत. जर योजना तयार करून काम करत राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षात तिसरी अर्थव्यवस्थाही होऊ शकतो.